Monday, October 25, 2010

आचरट!

नुकतेच अरूंधती रॉय चे नवीन आचरट विधान वाचावयास मिळाले. "Jammu and Kashmir was never an integral part of India"!! वाचलं.... डोळे तृप्त झाले. म्हटलं छान चाललंय. हिचे कोणीतरी पूर्वज नक्की पुण्यातले असणार. आपला ज्या विषयाशी काडीमात्रही संबंध नाही अशा विषयावर अशी दणादण मतं, तीही चुकीची, व्यक्तं करायला माणूस पुण्याचाच पाहिजे.

तर अरूंधती रॉयने एकहाती भारतातल्या लोकांची करमणूक करण्याचा वसा उचललेला दिसतोय. काही दिवसांपूर्वी तिने "India is a corporate, Hindu state" असं अजून एक गमतीशीर (खरं तर कानपटीत मारण्यासार्खं) विधान केलं होतं. तरी बरं ती स्वतः ख्रिश्चन आहे. खरंच, लोकांना अशी आचरट बुद्धी देण्यामागे देवाचा काय हेतू असू शकेल? सामान्य माणसाच्या रोजच्या कटकटीतून त्याला थोडातरी विरंगुळा मिळावा अशी इच्छा असावी कदाचित. ती ज्या वेगाने एकापेक्षा एक आचरट विधानं करत चालली आहे, त्या स्पीडने ती ती लवकरच "खरं तर सबंध भारतच पाकिस्तानामधे विलीन करायला हवा होता. लहानसाच पाकिस्तान देण्यामागे हिंदू नेत्यांचा डाव होता." असंही विधान करायला मागेपुढे पहणार नाही. शिरीष कणेकर त्यांच्या फटकेबाजी मधे म्हणतात बघा, " एकदा वात झाला ना माणसाला की काहीही भास व्हायला लागतात."

अशी सनसनाटी विधानं करण्यामगचा काय हेतू असू शकतो? माझ्या मते अरूंधती रॉय ही social activists मधली मल्लिका शेरावत होऊ पहाते आहे. "मल्लिका जेवढी चुंबनं देते त्या पेक्षा जास्त आचरट विधाने मी करूनच दाखवीन", या अट्टहासानेच जणू तिने हे बौद्धिक अंगप्रदर्शन चालवलेलं दिसतंय.(no offense मल्लिका !) ह्यापुढे तिची भाषणांना ’'A" सर्टिफिकेट देण्याची कल्पना कशी वाटते? (A for "Adult' नाही, A for आचरट !) आपण जे बोलतो, त्यामागे थोडातरी अभ्यास हवा, अशी अजिबातच कशी गरज वाटत नाही? अशा मेंदूला पोलिओ झालेल्या लोकांसमोर काय बोलणार आपण? उगाच नाही भारत पोलिओ उच्चाटनामधे अजून मागासलेला आहे !वस्तुस्थिती अशी आहे, की असल्या पोलिओंचं निदान मोठं झाल्यावरच होतं!

काश्मीरवरच्या तिच्या ह्या चिमखड्या बोलांवरून मीडिया मधे त्याची काय रिअ‍ॅक्शन होईल हे काय तिला माहित नसेल? पण मल्लिका शेरावतच्याच तत्वाप्रमाणे ( माझ्याकडॆ दाखविण्यासारखं आहे म्हणून दाखवते !) अरूंधती रॉयने आचरण करायचं ठरवलं असल्यामुळे, शेवटी शेवटी सगळे लोक " कोण अरूंधती रॉय बोलली का? जाऊ दे बिचारी ! तिच्याकडे काय लक्ष द्यायचं?" अशी प्रतिक्रिया द्यायला लागतील. आया आपल्या मुलींना सांगतील, अगं, जरा अभ्यास कर. नाहीतर मोठी झाल्यावर अरूंधती रॉय होशील !"